Friday, April 7, 2017

जागतिक आरोग्य दिन विशेष -नैराश्य

7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन....चला बोलूया नैराश्याविषयी

वेताळ - नैराश्य म्हणजे काय रे भाऊ?

विक्रमादित्य - येडया वेताळा...दर वेळीस मला गंडवून निघून जातोस त्यानंतर माझ्या मनाची जी अवस्था होते त्यास नैराश्य म्हणतात..

वेताळ - निट सांग की?  का राजा झाला म्हणून, काय बी सांगतो का?

विक्रमादित्य - हे बघ, वेताळा मी काही मानसशास्त्रज्ञ नाही.. *तरीपण नैराश्य म्हणजे निराशा इतके नक्की* म्हणजे बघ अस की, आपल्या मनासारख न घडल्यामुळे जी मनाची अवस्था होते त्यास नैराश्य म्हणतात..

वेताळ - ऐ राजा....राम कृष्णाच्या आयुष्यात पण मनासारखे घडले नाही, मग सामान्य मानसाची तर गोष्टच सोड.. बर या निराशेवर मात करण्याचे काही उपाय आहे का तुझ्याकड..

विक्रमादित्य- आहे ना...पण तुला का सांगू?

वेताळ - तुझ्या मायला तुझ्या, दर येळीस मी सुटतो आणि दर येळीस तू मला धरतो, मग मला बी नैराश्य येत ना!  आता सांगतोस का, उडवू मुंडक.?

विक्रमादित्य - हे बघ वेताळा, आशा निराशा, जय पराजय हा जिवनाचा एक भाग आहे.. निराशा आली असता ती दूर करण्यासाठी मनाची उत्तम ठेवण हवी, मन स्वस्थ हवे, जिवना विषयी निकोप दृष्टीकोन हवा आणि गरज पडलीतर तज्ञ माणसाचा सल्ला हवा..

वेताळ - ये राजा, काय येडा समजलास का? 
..भूत आहे म्हणून काय बी सांगू नग!

अर,  निराशा आली, समस्या आली की देव देव करावा, तिर्थाटन करावे, कौल लावावा, नवस बोलावा, बकर कापाव, सत्यनारायण घालावा, गृह शांती, ग्रहशांती, नागबळी करावा, घराच्या वास्तुपुजा करावी, चायनिज फेंगशुई करावी.. तिरूपती बालाजी, मक्का, मदीना, सेंट मेरी आणि कुठ जाऊन नवस बोलला की झाल काम..

विक्रमादित्य - वेताळा, आज पर्यंत हेच झाल...माणस संकटाचा, समस्येचा कार्यकारण भाव न शोधता , त्याची जबाबदारी धर्म पालनात झालेल्या चुकीवर किंवा पूर्वजन्मा सारख्या थोतांडावर टाकून मोकळे झाले...त्याचा फायदा धर्मगुरूंनी घेतला, निरनिराळी कर्मकांड सांगून गरीबांना लुटल.व बुडत्याचा पाय खोलत तसा गरीब आणखी खोल रूतत गेला..

वेताळ - विक्रमा, काय बी मनाच ठोकू नको,
पुराण, ग्रंथप्रामाण्य, यज्ञयाग, परंपरा काय खोटी का मग..अरे, आपले सण बघ, देवता बघ, कर्मकांड बघ, सगळ कस 1 नंबर, 5000 वर्षाची परंपरा...आहे का कुठल्या देशाला?

विक्रमादित्य - वेताळा, भूत असून लय ज्ञान पाजळू नको! अरे, आपली उपनिषद, कृष्ण, चार्वाक, बुध्द, ज्ञानेश्र्वर, तुकोबा, गाडगे महाराज यांच तत्वज्ञान आपण अंगिकरलच नाही..निव्वळ फसत गेलो, काल्पनिक देवता यांची पूजा करून ज्ञान मिळणार आहे का? कर्मकांडातून समस्या सुटणार आहेत का? दक्षिणा, नवस यातून प्रगती होणार आहे का? जरा शांतपणे विचार कर वेताळा.

वेताळ - ये विक्रम, सकाळी सकाळी फुलटू झालास का? देव धर्माला नावे ठेवतोस, हिंदूद्रोही, देशद्रोही, पाकिस्तान समर्थक....बोल भारत माता की...जय.

विक्रमादित्य - वेताळा, मरायच्या आधी कोणत्या पक्षात होता?
अरे,  याच 'गप्पबसा ' संस्कृतीमुळे आपली हानी झाली...मी जे सांगितले ते माझे ज्ञान नसून सर्व संतांच्या ज्ञानाचे सार आहे..देव हा देवळात नसून, सत्कर्मात आहे...
तुकाराम बुवा म्हणतात

*जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, साधु तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा*...

वेताळा, देव देवळात नसतो..तो तुझ्या माझ्यातच असतो.

वेताळ- ये विक्या,, उगीच बधीर करू नकोस ..लेका...लय ज्ञान सांगतोस..मग सांग बर नैराश्य, समस्या येवू नये म्हणून काय कराव?

विक्रमादित्य.- ये वेताळा, विक्या काय, जरा सभ्यपणे बोल..अरे समस्या आली व सुटली नाही की नैराश्य  येत ना..मग समस्याच येवू नये म्हणून......

वेताऴ - काय?  सांग की?

विक्रमादित्य - सांगतो..नम्र भाषा, सदाचार, व्यसन व व्यभिचारापासून दूर राहणे, खोटे न बोलणे, अहिंसा, सतत कार्यमग्न राहणे, ज्ञानी माणसांचा सहवास, चिकित्सक बुध्दी, निर्भयता, चोखंदळपणा,, अनुकूल ठिकाणी वास्तव्य, बहुश्रुतता, सदाचार, अहंकार मुक्त असणे, हस्तकौशल्ये प्राप्त करणे, कुटुंबाची व राष्ट्राची काळजी, निर्रर्थक कर्मकांड पासून दूर राहणे, उदयोगव्यवसाय लक्ष देवून करणे, कामचुकारपणा न करणे, दान देणे, मैत्रीभावना जोपसणे, निसर्गाविषयी अनुकंपा, मित्र मंडळी व आप्तांना मदत, कामगारांवर विश्वास, निर्दोष कर्मे, आई वडील, व वरिष्ठांबद्दल आदर इ.मुळे जीवनात समस्या निर्माण होण्याचे प्रमाण कमी राहते....राहील का लक्षात,
वेताळा..

वेताळ - राजा, भारी बोललास..पण एवढ करून जर समस्या आलीच तर? बोल बोल...आहे का उत्तर

विक्रमादित्य - वेताळा चांगला प्रश्न..समस्या आली की खचून न जाता व निराश न होता समस्येचे आकलन करावे..समस्या आहे हे प्रथम मान्य करावे, जिथे समस्या तेथे उत्तरही असणार याची खात्री बाळगावी..दैववादी न होता..विविध पर्यायांची पडताळणी करावी..तज्ञांचा व जेष्ठांचा सल्ला घ्यावा..एवढे करूनही समस्या न सुटल्यास शांतपणे अनुकूल परिस्थितीची वाट पहात प्रयत्न सोडू नये...तथापी कधीही निरर्थक कर्मकांड करू नये..

वेताळ- राजा, तुझ्या हुशारीपुढे व भारतीय संतपरंपरेच्या, बुध्दांच्या, चार्वाकांच्या या विचारांमुळे माझे डोळे उघडले. पण

तु बोललास,  मी सुटलो...

हा हा हा
( वेताळ मनातल्या मनात..

देवाळतर देव नाही असे विक्रमादित्य संतांचा दाखला देवून म्हणतो, तर मग आता देवळातच लपतो,  मग त्याला सापडणारच नाही)

गिरीश प्रभाकर कु-हाडे पाटील
7798981199
Kurhadegirish@gmail.com

No comments:

Post a Comment